Search This Blog

Showing posts with label Well. Show all posts
Showing posts with label Well. Show all posts

Tuesday, November 24, 2015

अडालज की वाव - Adalaj Stepwell





अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या 

अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता. 
  
अडालज बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या प्रसादासारखी नटलेली आहे. 



ह्या अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात झाली. 


राणा वीर सिंगशी झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि राणा वीर सिंग ना युद्धात वीरगती प्राप्त झाली. राणा जी च्या पत्नी राणी रूपबा ह्या अत्यंत रूपवान होत्या आणि ती बातमी सुलतानाला समजल्यावर हा सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करू लागला. अर्थात ती मागणी ही धमकीपेक्षा कमी नक्कीच नसणार. राणी ने अट घातली की तिच्या पती ने हाती घेतलेली अडालज विहीर जर सुलाताने पूर्ण केली तर ती लग्नाला संमती देईल आणि मग काय, हे अडलेलं काम अत्यंत वेगाने सुरु झालं. विहीर पूर्ण झाल्यावर राणी ने जातीने विहिरीची पाहणी केली, संत सज्जनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करू देऊन ते पाणी पवित्र केलं आणि मग ह्यात विहिरीत उडी मारून जीव दिला. एक पतिव्रता स्त्री मरणापूर्वी गावकऱ्यांसाठी अमूल्य उपहार देऊन गेली आणि आपल्यासारख्यांना अभिमान देऊन गेली. राणीच्या आत्मदानाचा ह्या विहिरीशी संबध आहे. एका वीर राजपूत राणीच्या बलिदानाची साक्ष देत ही विहीर आज 500 वर्ष उभी आहे. 


विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे. 



विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात



विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.


ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे. 

गुगल नकाश्यावर अडालज ते अहमदाबाद पर्यंतचा मार्ग दाखवला आहे 








Sunday, September 27, 2015

बारा मोटाची विहीर - Bara Motachi Vihir







सातारा आणि परिसर हा पर्यटकांना नक्कीच आकर्षित करणारा परिसर आहे. कास पठार, अजिंक्यतारा, सज्जन गड, ठोसेगरचा धबधबा आणि असं बरच काही पण त्याच बरोबर काही प्रसिद्धी पासून दूर राहिलेली तरीही नक्की भेट द्यावी अशीही काही ठिकाणं साताऱ्या परिसरात आहेत. ह्या अश्या काहीश्या दुर्लक्षित ठिकाणांपैकी एक आहे “ बारा मोटाची विहीर ”. हि एक प्रचंड अष्टकोनी विहीर का बांधली गेली ? कोणी बांधली? आणि आज तिची स्थिती काय आहे ? असे अनेक प्रश्न मनात होते जेव्हा मला ह्या पुरातन विहिरी बद्दल माहिती मिळाली आणि योगायोगाने लवकरच ही अप्रतिम कलाकृती बघण्याचा योग आला.

मी आणि आमचे भटकंतीत रमणारे काही मित्र कास पठारावर निसर्गाने मांडलेले रान फुलांचे गालिचे आणि केलेली रंगांची उधळण बघायला गेलो होतो आणि मग परततांना ह्या बारा मोटाच्या विहीरीला ही अगदी ठरवून गेलो. काही माहिती होती तर एक पूर्वी जाऊन आलेला जाणकार मित्र ही बरोबर होता. साताऱ्याहून पुण्याकडे येतांना साधारण साताऱ्यापासून १७ किमी अंतरावर लिंब नावाचं एक लहानसं गाव आहे. विहिरी पर्यंत जाणारा रस्ता ही कच्चा आहे पण गाडीने अगदी विहिरी जवळ जाता येते. हल्ली गावात विहिरीचा रस्ता दाखवणारे दिशादर्शक फलक ही लावलेले आहेत 


शाहू महाराजांना वयाच्या ७ व्या वर्षापासून औरंगजेबाने नजरकैदेत ठवले होते आणि त्यांना राजा म्हणून मान्यताही दिली होती, त्यांना ७ हजारी मनसब बहाल झाली होती पण स्वराज्याचा राजा कैदेत होता. शाहू महाराज कैदेत असतांना शाहू महाराजांचा विवाह मानसिँहराव रुस्तूमराव जाधवराव यांचि कन्या अबिँकाबाई / राजसबाई यांच्याशी झाला होता त्या दुर्दैवाने काही काळाने तेथेच वारल्या, त्यांच्यासोबत वीरुबाई आंदण दिल्या होत्या. पुढे औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची सुटका करण्यात आली जेणेकरून भोसले कुटुंबीयात राज सिंहासनासाठी आपसी वैमनस्य वाढून त्याचा फायदा मोगलांना मिळावा. पण शाहू महाराजांना अनेक जुन्या सरदारांची साथ मिळाली आणि ते १२ जानेवारी १७०८ रोजी सिंहासनाधीश्वर झाले. सातारा स्वराज्याची राजधानी झाली. साताऱ्यापासून साधारण १७ कि मी अंतरावरील लिंबू गावात शाहु महाराजांनी देशभरातून विविध आंब्याची कलम आणून एक सुंदरशी आमराई वसवली होती आणि मग ह्या आमराई ला लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी राणी वीरुबाईनी हि अप्रतिम विहीर स्वता:च्या देखरेखीत बनवून घेतली होती





त्याचा उल्लेख वरील शिलालेखात सापडतो (श्री सौभाग्यवती वीरुबाई साहेब ) ह्या विहिरीचे बांधकाम ५ वर्ष ३ महिने चालले. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार साधारण नोव्हेबर १७१९ ला चालू झालेले हे बांधकाम फेब्रुवारी १७२५ ला पूर्ण झालं (शके कार्तिक वद्य त्रयोदशी शक १६४१ ते फाल्गुन वद्य द्वितीया शक १६४६). ह्याची नोंद विहिरीच्या प्रमुख द्वाराजवळील शिलालेखावर दिसते. शिलालेखावरील अक्षरे जुळवत वाचून हे समजते. इथेला शिलालेखाचा फोटो अक्षरे जोडून टाकला आहे. ह्या शिलालेखामाध्ये बहुदा विष्णूचा वराह अवतार कोरला आहे पण तो तितकासा स्पष्ट दिसत नाहीप्रमुख जिन्याशी असलेल्या ह्या शिलालेखा खालून विहिरीकडे जाणारा प्रमुख जिना उतरतो तो आपल्याला उपविहिरीत घेऊन जातो आणि समोर दिसते पालखीसारखी एक लहान खोली जिथे जायचा रस्ता मात्र समाजत नाही. हि आहे राजेसाहेबांची विश्रांती आणि प्रसंगी गुप्त खलबतची खोली. इथे 


जायला अत्यंत चिंचोळा जिना विहिरीच्या डावीकडून आहे. ह्या खोलीतील खांब नक्षीने सजवलेले आहेत. तिथे पडदे बगैरे लावण्यासाठी लोखंडी हुक आज ही शाबूत आहेत. ह्या खोली खालून गेलो की दिसते प्रमुख विहीर जी भव्य आहे आणि अगदी दुष्काळी परिस्थितीतही १२ महिने पाणी असतं जे आजही लिंब गावाला हिरवागार ठेवतय. ह्या अष्टकोनी प्रमुख विहिरीला ९ मोटा आहेत. आणि उप विहिरीला ६ मोटा लावलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत १५ मोटा पण बहुदा ३ मोटा ह्या जादाच्या व काचित प्रसंगी वापरत घेत असाव्या म्हणून ह्याला बारा मोटाची विहीर म्हणून ओळखतात असं समजलं. विहिरी पर्यंत पोचण्याचे दगडी जिने अजूनही अगदी मजबूत दिसतात, एकंदरीत ही विहीर उत्तम परिस्थितीत आहे म्हणूनच प्रेक्षणीय ही आहे.





प्रमुख विहिरीच्या भिंतींवर सिंह शिल्प आहेत आणि काही शिल्पामध्ये सिंह चर हत्तींना पायदळी तुडवतो आहे जे चार पातशाह्या मारल्याचे चिन्ह आहे तर उत्तरेकडे झेपावणारे सिंह दिल्ली केडे झेपावत आहेत अस मानलं आहे. खरोखरीच बाजीरावांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं होत. 







एका दरवाजावर दोन्ही बाजूला शरभ शिल्प ही आहेत. शरभ हा काल्पनिक प्राणी अनेक संस्कृत उताऱ्यामध्ये नोंदवला आहे जो सिंह हत्तीपेक्षा ही सामर्थ्यवान मनाला जातो. तसेच महाल आणि इतर दरवाज्यांवर पुष्प चिन्हे ही कोरली आहेत.







उपविहीर आणि मूळ विहिरीच्या मधोमध जो छोटाखानी महाल आहे त्याच्या बरोबर वरती सिंहासनाची जागा आहे, अर्थात सिंहासन वगैरे नाही आता पण जेव्हा शाहू महाराज आमराईत येत तेव्हा ह्याच ठिकाणी बसून गावकऱ्याशी चर्चा , न्यायनिवाडा करत 

एकंदरीतच ही वास्तू फारच छान आणि मस्त वाटते. एकतर गुजराथमध्ये जश्या कलाकुसरीने युक्त आणि प्रचंड अश्या बाव (विहिरी) आहेत तश्या महाराष्ट्रात फारश्या नाहीत पण हि विहीर साधीशी पण सुस्थितीत आहे. 

ह्या विहिरीच्या समोर मात्र एक लहानसं मंदिर आहे, अगदी वडाच्या झाडाला खेटून पण नवलाची गोष्ट म्हणजे त्या मंदिराला कळस नाही. मंदिरा बाहेर लहानसा नंदी ही विराजमान आहे. कळस नसलेल्या मंदिराचं रहस्य काही उलघडलं नाही. गावात अजून ही काही पुरातन मंदिरं आहेत त्यातील एका कोटेश्वर मंदिराच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो त्याची माहिती ही ब्लॉगवर टाकतोच आहे.





सातारा ते बारा मोटाची विहीर हा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे .