Search This Blog

Tuesday, June 28, 2016

गणेश घोळ मंदिर - Ganesh Ghol Mandir




शिळफाटा म्हंटल की खिडकाळेश्वाराचं पुरातन मंदिर किंवा अगदी शिळफाट्यावर वसलेलं दत्ताचं मंदिर ही चांगली माहितीतली मंदिर आहेत पण शिळफाट्या समोर दिसणाऱ्या टेकडीवर निसर्ग रम्य अश्या वातावरणात एक गणेशाचं सुंदर मंदिर ही आहे हे नेहमी त्या रस्त्याने जाणार्यांना फारतर माहिती आहे. 

पावसाळ्यात हिरवागार होणारा हा परिसर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तसाच असतो. रानफुलं, हिरवीगार झाडं आणि ह्या सगळ्याच्या मध्ये वसलेलं टेकडीवरच हे एक लहानसं मंदिर नक्कीच भेट द्यावं असं आहे. पावसाचा जोर चांगला असेल तर जिथून टेकडी चढायला सुरुवात करतो त्याच्या थोडं डावीकडे पाण्याचा एक जोरदार ओहाळ बघायला आणि इच्छा असेल तर डुंबायला मिळतो.



शिळफाट्याला डोंबिवलीकडून आलो की डावा रस्ता पनवेल कडे, उजवा रस्ता मुब्र्याकडे आणि एक रस्ता समोर टेकडीवर जातो जो पुढे महापे मार्गे वाशीकडे जातो ह्या रस्त्यावर टेकडीचा अर्धा चढ गाडीने गेलो की डाव्याबाजूला काही वेळाने टेकडीवर जाणारे जिने दिसतात हेच तुम्हाला गणेश घोळ मंदिराकडे नेतात .


साधारण १४०-१५० स्टेपस आहेत पण दमावणाऱ्या नाहीत. साधारण १०-१५ मिनिटात तुम्ही ह्या मंदिरापर्यंत येऊन पोचतात. मंदिराचा परिसर स्वच्छ आहे आणि मंदिराची देखरेख , पूजा अर्चा करण्यासाठी एक महाराज मंदिरासमोर घर बांधून राहतात. परिसरात फुलझाड लावलेली असल्याने परिसर प्रसन्न वाटतो. एका खूप जुन्या वडाच्या झाडावर एक झोपडी बनवली आहे जिथे शिडीने जावं लागतं. नुकत्याच झालेल्या कुठल्याश्या एका सोहळ्यासाठी होम कुंड , हवन मंडप आणि काही लाकडाच्या झोपड्याही बनवल्या आहेत. बहुदा एखाद्या साधू चा आश्रम असावा



मंदिराकडे नेणारा रस्ता नागमोडा आहे आणि परिसर हिरवागार असल्याने खूप प्रसन्न वाटत. मंदिरात दगडाला शेंदूर फासून एक नैसर्गिक मूर्ती आणि एक गणरायाची नवीन मूर्ती अश्या दोन मुर्त्या आहेत. मंदिर एका मोठ्ठ्या दगडाच्या खोबणीमध्ये वसवलं आहे. ह्या टेकडीवरून आजूबाजूचा परिसर ही मस्त दिसतो. पावसाळ्यात मनमुराद भिजत जायला डोंबिवली जवळचा हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. हिवाळ्यात ही भरपूर पक्षी, रानफुलं आणि हिरवागार निसर्ग आपलं स्वागत करतच जणू इथे उभा असतो.

डोम्बिवली हून कार , दुचाकी किंवा अगदी वाशीकडे जाणाऱ्या बस ने आपण इथे पोहचू शकतो. फत्त कल्याणफाटा ला उतरून १०-१२ मिनिट जास्त चालावं लागतं. इथे यायला भरपूर बसेसची सोय आहे. भरभरून पाउस पडत असल्याने फोटो मोबाईल ने काढले कॅमेरा बाहेर काढायची हिंमत झाली नाही


गुगल नकाश्यामध्ये ह्या मंदिराचं नाव ओंकारेश्वर मंदिर दाखवलं आहे ते बदलायची विनंती गुगल कडे केली आहे 

.






Friday, April 29, 2016

Maharashtra Nature Park - महाराष्ट्रा निसर्ग उद्यान



Maharashtra Nature Park


टाकाऊ तून टिकाऊ हे वाक्य आपण खुपदा ऐकतो पण अश्या एखाद्या टाकाऊ जमिनीवर हिरवीगार वनराई निर्माण करून निसर्गाची जणू पूजा मांडल्याचा अनुभव येतो तो ह्या महाराष्ट निसर्ग उद्यानात. मुंबईच्या अगदी मध्यात असं दाट जंगल, विविध फुलपाखर आणि अनेक पक्ष्याची घरं असू शकतं हे तिथे प्रत्यक्ष गेल्यावरच कळतं. इथे साप ही आहेत पण जास्त करून Rat snake,  जे माझ्या माहिती प्रमाणे विषारी नसतात आणि असं ही ते माणसाच्या नादी लागत नाहीत 

मुंबईत सुट्टीच्या दिवशी मुलांना निसर्गाच्या सानिध्यात न्यायाची इच्छा असेल तर हि एक उत्तम जागा आहे. विविध पक्ष्यांचे वास्तव्व्य असल्याने पक्षीमित्रांची गर्दी तर हे उद्यान खेचतच पण त्याच बरोबर शांत सुंदर आणि निसर्गाने बहरलेलं वातावरण प्रेमी युगुलांना ही आकर्षित करत. 





संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाखाली खितपत पडलेली ही साधारण ३७ एकर जमीन काही विचारवंतांच्या सुपीक विचारांनी आणि मेहनतीने एका सुंदर उद्यानात रुपांतरीत झाली आहे. १९९४ पासून ह्या जमिनीभवती कुंपण करून वृक्ष संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली आणि आज इथे दाट जंगल पूर्णत्त्वास आलेलं बघायला मिळतं


मी आणि मजा छोकरा दोघे भर उन्हाळ्यात इथे पोचलो आणि २-३ तास कसे गेले ते समजलं सुद्धा नाही. खरं तर उद्यान सकाळी ८:३० ला उघडतं आणि शनिवारी रविवारी ७:३० ला आणि जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर इथे जायला हवं. आम्ही उद्यानात प्रवेश केला आणि लगेचच आम्हाला दोन तांबट पक्षांची ची मस्ती , कावळा कोकिळा पकडा पकडी, घारी ची शिकार, जंगली मैना आणि अनेक पानथळ जागेवर दिसणारे पक्षी दिसले. उद्यानाच्या बाजूला वाहणारी मोठी गटार नसून ती मिठी नदी आहे हे मुलाला सांगतांना मलाच लाज वाटत होती. इतकी दुर्गंधी ह्या नदीला येते. इतक्या कलुषित पाण्यात काय मासे वाढणार आणि काय हे पक्षी तिथे खाणार. नदी ची ती दशा बघून नक्कीच वाईट वाटत. 
उद्यानात विविध संस्थेचे निसर्ग संबंधित तसेच फोटोग्राफी, चित्रकला शिबिरं हि होतात आणि त्यासाठी उत्तम व्यवस्था इथे आहे. स्वच्छ प्रसाधनगृहे आणि उत्तम पाण्याची व्यवस्था ही नेहमी न आढळणारी काही वैशिष्ठे इथे बघायला मिळतात. अर्थात बाजूला धरावी ची प्रसिद्ध वसाहत आणि मिठी नदीत प्रचंड कचरा त्यमुळे अनेक कावळे घिरट्या मारतांना प्रथम दिसतात पण जरा नजर फिरवली तर बाकी पक्षी सुद्धा नजरेस पडतात. विविध फुलांची झाडं आहेत आणि सर्व ऋतूमध्ये बहरणारी झाडं इथे मोठ्या विचारपूर्वक लावली आहेत. बहावा, रक्त चाफा, कैलाशपती वगैरे झाडांनी आणि दाट सावलीने बनवलेल्या नैसर्गिक ए सी ने आमचा संपूर्ण थकवा काढून टाकला. उद्यानाची देखरेख करायला टीम आहे जे सतत उद्यानात फेरफटके मारत असतात. उद्यानात सुंदर नर्सरी सुद्धा राखलेली आहे. सप्टेंबर ते मार्च हा इथे जायला बेस्ट मोसम असावा अर्थात भर उन्हाळ्यात ही फुलपाखर कमी दिसतील पण १२ महिने इथे जायला हरकत नाही 


ह्या उद्यानाची प्रवेश फी रु १० आहे जी खरोखरीच खूप कमी आहे. सायन स्टेशन पासून अगदी चालत तुम्ही ह्या उद्यानात जाऊ शकता. एखाद्या शनिवारी किंवा रविवारी तुमच्या मुलांना घेऊन छोटेखानी पिकनिक नक्की करा








महाराष्ट्रा निसर्ग उद्यान - गुगल नकाशा इथे दाखवला आहे 



Monday, January 11, 2016

वसई चा किल्ला - Bassein Fort - Vasai Fort



मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा विशाल जलदुर्ग मदतीची हाक मारत उभा आहे. विशाल ह्या साठी की हा किल्ला ११० एकर वर्ग इतक्या क्षेत्रफळावर पसरलेला आहे. पूर्वी ह्या किल्ल्याच्या तीन बाजुंना पाणी / दलदल असायची पण आता समुद्र काही किमी आत सरकला आहे आणि किल्ला समुद्र तीरी वसल्यासारखा दिसतो. किल्ल्याभावती तिवराच जंगल दिसतं. आणि किल्ल्याला लागून उभी राहिलेली बांधकामं. किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत तसेच दुर्लक्षित राहिल्यामुळे किल्ल्यात दाट जंगलाचा भाग हि आहे. आता ही वेडीवाकडी वाढलेली झाडं, वेली इथल्या अमूल्य ऐतिहासिक वास्तूंना वेढा घालून बसल्या आहेत ज्यामुळे ह्या पुरातन बांधकामाची वेगाने क्षती होत आहे. किल्ल्यात ताडीची झाडं उगवली आणि तो धंदा ही जोरात चालू आहे म्हणूनच म्हटलं की हा अप्रतिम किल्ला मदतीची हाक मारत उभा आहे. 



हा किल्ला जरी पोर्तुगीजांची ओळख सांगणारा असला तरी हा खरा बांधला तो भंडारी भेंडाले ह्या सरदाराने १४१४ साली. त्यापूर्वी सुद्धा हा प्रदेश प्रसिद्ध होताच ते म्हणजे एक बंदर म्हणून, अगदी यादव राजांच्या काळात आणि त्या पूर्वी सुद्धा ह्या प्रदेशाचा उल्लेख आढळतो पण किल्ला बांधला गेला तो भंडारी भेंडाले ह्यांच्या कार्यकाळात. पुढे गुजराथ सुलतानाने किल्ला ताब्यात घेतला तो १५३० साली आणि नंतर पोर्तुगीजांनी किल्ला जिंकला तो १५३४ साली असं इतिहास सांगतो. आणि किल्ल्याचा खरा उत्कर्ष घडला तो पोर्तुगीजांच्या काळात, साधारण दहा वर्ष किल्ल्याचे बांधकाम सुरु होते. भक्कम तटबंदी, १० बुरुज आणि एका नंतर एक बांधली गेलेली सात चर्च तसेच न्यायालय, तुरुंग, आश्रम, जहाज बांधणी चे कारखाने, पुरातन स्नान गृहे, दवाखाने असं बरच काही ह्या किल्ल्यात बनत राहिलं नंतर १७३७ साली मराठ्यांने हा किल्ला जिंकून त्याचे नामांतर ही केले होते तेव्हा किल्ल्याचे नाव होते “बाजीपूर” आणि किल्ल्यात बरेच काम ही केली गेली. हा किल्ला जिंकतांना १२०० मराठे आणि ८०० पोर्तुगीज सैन्य धारातीर्थी पडलं आणि गडावार भगवा फडकला. तब्बल २०५ वर्षांनी वसई पोर्तुगीजमुक्त आणि जुलूममुक्त झाली पुढे १७८० साली हा किल्ला ब्रिटीशांच्या हाती गेला आणि हळूहळू किल्ल्याचे महत्व कमी होत गेलं. १८६० साली ब्रिटिशांनी हा किल्ला चक्क भाडेपट्टी वर एका सैन्य अधिकाऱ्याला दिला आणि तिथे त्याने उसाची शेती केली. पोर्तुगीज चर्च चा कारखान्या आणि गोडाऊन सारखा उपयोग केला त्या काळात किल्ल्याची हानी होत राहिली. स्वातंत्रानंतर हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. पण ह्या किल्ल्या अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे.
ह्या किल्ल्यामार्फत मासे, जातिवंत घोडे, जहाज बांधणी असे अनेक व्यवसाय भरभराटीस आले होते. पोर्तुगीजांच्या भरभराटी बरोबरच भूमिपुत्रांवर होणारे अतोनात अत्याचार आणि जबरदस्तीने चालेली धर्मपरिवर्तन सुद्धा ह्या किल्ल्याला पहावी लागली. १५४८ साली पोर्तुगीज संत फ्रान्सिस्को झेविर ह्या किल्ल्यात उतरला होता आणि त्याकाळात प्रचंड लोकांचे धर्मपरिवर्तन केले गेल्याची नोंद इतिहासात आहे.

किल्ला संपूर्ण बघायला एक अख्खा दिवस सुद्धा कमी पडतो. किल्ला बघता बघता अनेक रानफुलं, फुलपाखर आणि पक्षी बघायला मिळतात म्हणजे ऐतिहासिक वास्तू आणि निसर्ग भ्रमंती दोन्ही चा आनंद घेता येतो. आम्ही किल्ला बघायला सुरुवात केली ती दर्या दरवाजा कडून, समुद्राकडे उघडणारा हा दरवाजा. भरभक्कम भिंती आजही शाबूत आहेत आणि गत वैभवाची साक्ष देत खंबीर उभ्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजाला लागून एक लहानसे मंदिर ही आहे आणि बाजूला तिवराची जंगलं. जुना लाकडी दरवाजा मात्र मोडकळीला आला आहे. प्रवेश सरळ ना ठेवता एका दरवाजा नंतर लगेच दुसरा दरवाजा ९० अंशाच्या कोनात बांधला आहे. इथून आत आलो की किल्ल्यात नाही तर जंगलात आल्याचा भास होतो इतकी झाडी आहेत. मग लागतात वाखारीचे अवशेष आणि मग सेंट जोसेफ चर्च, 



जोसेफ चर्च हे १५४६ ला बांधलं गेलं, घंटेसाठी बांधलेला मनोरा, तटबंदीला लागून असलेले हे चर्च त्याच्या मागच्या दराने तटबंदी कडे जायला दगडी शिड्या हि आहेत. एक मोठी कमान अजून शाबूत आहे आणि त्यावर आतून पोर्तुगीज पद्धतीची नक्षी आहे आणि समोर उंच मनोरा. त्यावर जायचा जिना ही मोडकळीस आला तरी शाबूत आहे. काही बंद केलेल्या खिडक्या आहेत. हे चर्च नंतर बरेच बदलेले असावे असं वाटतं. चर्च समोर दाट जंगल आणि ताडीची झाडं ही आहेत. बाजूच्या तटबंदी वरून समुद्राचे रूप बघायला मिळतं.



इथून हा रस्ता पुढे बालेकिल्ल्याकडे जातो हा मोठा परिसर आणि पाणी, शस्त्र भांडार आणि अनेक दगडी खोल्या असलेला बालेकिल्ला आहे. ह्याचा दरवाजा पडका आहे आणि इथे हि एका दरवाजा नंतर वळून दुसरा दरवाजा लागतो. विस्तीर्ण परिसर, जाड दगडी भिंती आणि बालेकिल्ल्याला लागून आहे नोस्सा सेन्होरा चर्च हे साधारण १५३५ साली बांधलं म्हणजे बालेकील्ल्यासोबातच ह्याचं काम सुरु झालं असावं. बाहेरील तटबंदी ही १५३६ नंतर बनवली गेली. 




बालेकिल्ल्याचा एक बुरुज जरा ठीक रुपात उभा आहे आणि जवळच स्नानगृह, न्यायालय आहे तसाच नागेश्वर मंदिर आहे. पुढे कारागृह, हॉस्पिटल ह्याचे अवशेष 


पुढे भव्य पण पडीक डोमिनिक चर्च, जे संत गोन्कॅलो च्या नावाने १५८३ ला बांधण्यात आलं, एकंदरीतच पोर्तुगीजांनी चर्च आश्रम ह्याच्या माध्यमातून धर्मप्रचाराचा जोर वाढवत नेला होता. हे चर्च आणि त्याला लागुनच असलेला आश्रम फारच मोठा आहे अर्थात हे सगळं आता भग्नावस्थेत बघायला मिळतं




ह्या चर्चला लागून डांबरी रस्ता जातो तो ओलांडला की भव्य चिमाजी अप्पा ह्याचे स्मारक. अप्रतिम पुतळा आणि त्यावर विराजमान योद्धा. खरोखर अप्रतिम कलाकृती आहे, अर्थात अलीकडचीच पण अभिमानाने मन भरून यावं अशी

ह्या रस्त्याने वसईकडे चालत निघालो की बाजूला कवायतीचे मैदान आणि पलीकडे अजून खंबीर उभी तटबंदी दिसते आणि हा रस्ता जिथून किल्ल्या बाहेर निघतो त्याच्या डाव्या वाजूला दिसतो एक खुष्कीचा मार्ग. अक्षरश: ह्या दरवाजातून गेलं की गोल फिरत चिचोळ्या वाटेने किल्ल्यात प्रवेश आहे. इथे आता मध्ये एक मारूतीच मंदिर आहे पण ते पूर्वी नसणार. ह्या दरवाज्यातून शत्रू आला तर अगदी हातावर मोजता येतील इतके सैनिक शेकडोच्या सैन्याला अडवून धरू शकतात अशी ह्या मार्गाची ठेवण आहे. हा दरवाजा आतून मात्र नक्षीकामाने नटला आहे किंवा असं म्हणू की इथे थोडे नक्षीकाम शिल्लक आहे.




ह्या दरवाज्याचा वरच्या बाजूला गेलं तर आपण फत्ते बुरुजावर जातो तिथे झेंडावंदनाची सोय आहे, बहुदा ठराविक कार्यक्रमाच्या वेळी इथे सरकारी झेंडावंदन हल्ली होत असावं

फत्ते बुरुजावरून समोर दिसत ते फ्रान्सिकन चर्च , हे सुद्धा प्रशस्त चर्च आहे आणि त्यात पोर्तुगीज राज्यासाठी काम करणाऱ्या वीर योध्याच्या कौतुकासाठी एक खास व्यवस्था आहे. ह्या चर्चच्या दगडी जमिनीवर थडग्याचे दगड नावासहित लावलेले आहेत, त्यावर त्या वीरा च नाव आणि काही पोर्तुगाल चिन्ह त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून लावलेले दिसतात. ह्या चर्च ची कमान आणि एकंदरीत बांधणी बघता हे नक्कीच एक अतिभव्य चर्च असणार ह्याची खात्री पटते. चर्च शेजारी आश्रम हि आहे


पुढे अजून काही चर्च काही पडीक घराचे अवशेष, जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष असं अजूनही बरच बघण्यासारखं आहे. दहा बुरुजांचा हा भव्य किल्ला वाचवण आणि जतन करणं अत्यंत महत्वाचं वाटत. काही वर्षपूर्वी इथे अनेक महत्वपूर्ण गोष्टी उत्खालनात सापडल्या त्यात काही विरगळ हि आहेत . 

विरगळ म्हणजे वीर पुरुषाची शिळा ज्यावर युद्धाचे प्रसंग कोरलेले असतात. म्हणजे लढतांना प्राण अर्पिलेल्या ह्या वीराचे विरगळ हे स्मारकच म्हणा ना. आता हि विरगळ ची पद्धत यादव आणि शिलाहार कालीन म्हणजे हा प्रदेश हजारो वर्षाचा इतिहास सांगू शकेल. इथे कदाचित असे अनेक पुरावे माहिती मिळू शकेल. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे केवळ वसई किल्ला आणि फक्त पोर्तुगीज हे समीकरण कदाचित उद्या खोट ठरेल.


चिमाजी अप्पा आणि त्यांच्या सोबत लढणाऱ्या सर्व वीरांचे आणि स्वभूमी परत मिळवण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या १२०० वीर मराठ्यांचे विचार मानत घोळवत हि भटकंती संपते. 

वसई स्टेशन पासून रिक्षा आणि लोकल बस ची उत्तम सुविधा आहे ज्याने तुम्ही किल्ल्याच्या मधोमध पोहचू शकता. स्वत:चे वहान असल्यास किल्ल्यात वाहनाने हि फिरता येतं. किल्ला जमिनीवर असल्याने कुठे उंच चढाई नाही. ह्या किल्ल्याला एकदा भेट देणं नक्कीच गरजेचं आहे.


खाली नकाश्यामध्ये वसई किल्ल्यातली प्रेक्षणीय स्थळे  मार्क केली आहेत.