Search This Blog

Saturday, December 19, 2015

होळकर राजवाडा - Holkar Palace, Indore



इंदौर हे मध्यप्रदेशातील एक महत्वाचे शहर आणि ह्या शहरात मानाने उभ्या असेलेल्या काही इतिहासील वस्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकर वाडा, शिवरायांचा मावळा गगनभरारी घेत निघाला आणि त्याने राज्यविस्तार करता करता भारतात अनेक प्रमुख शहरात आपले बस्तान बसवले, थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते हे होळकर. अटकेपार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चालेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथे त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले. बडोद्याला गायकवाड, ग्वाल्हेरला शिंदे (आत्ताचे सिंधिया) तसेच इंदौर चे हे सरदार होळकर.



मल्हारराव होळकर ह्यांनी स्वराज्यनिर्माण कामात सिंहाचा वाटा उचलला. श्रीमंत बाजीरावांबरोबर अनेक लढाया जिंकल्या. सन १७३८च्य पालखेडच्या प्रसिद्ध लढाईत सुद्धा पेशव्यांबरोबर मल्हारराव होते. सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि लढाया संपूर्ण मानसिक विवंचने शिवाय लढता येतील म्हणून शाहू महाराजांकडे शब्द टाकला. हि जहांगिरी ची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली आणि श्रीमंत बाजीरावांशी सल्ला मसलत करून मल्हार रावांच्या पत्नी सौ गौतामाबाई होळकर ह्यांना खाजगी जहांगिरी प्रदान केली. सन १७३४ ला बहाल केलेल्या ह्या खाजगी जहांगिरीत मालवा, खान्धेश मधील अनेक गावांबरोबर इंदौर चा ही समावेश होता. आणि मग होळकरांचे कुटुंब इंदौरला स्थिर झाले. पुढील काही वर्ष हि मंडळी खाननदी काठी राहिली आणि साधारण सन १७४७ ला ह्या राजवाड्याचे काम चालू झाले. ह्या राजवाड्याने मराठ्यांचा पानिपतात झालेला प्रभाव ऐकला आणि सन १७६५ ला पानिपत युद्धाचे दु:ख ना पचवता मल्हाररावांनी जगाचा निरोप घेतला आणि मग राजकारण पहिले, अनेक शासक पहिले. मराठ्यामधले आपसी वैर पहिले. होळकरांमधील अंतर्गत गृहयुद्ध ही पहिले. 


मल्हाररावांनंतर अहिल्याबाई होळकरांनी राजधानी महेश्वरला जरी हलवली तरी इंदौर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली. त्यानंतर चे शासक यशवंतराव होळकरांच्या काळात मात्तबर मराठे सरदार शिंदे आणि होळकरा यांच्यामधील दुही विकोपाला गेली आणि होळकरांनी उज्जैन वर हल्ला केला आणि बदला म्हणून शिंदेंचे सेनापती सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदौर वर हल्ला केला. राजवाड्याचे अतोनात नुकसान झाले, मल्हाररावांनी त्यांचा खजिना वाड्यात लपवला आहे असे समजून वाडा खोदून काढला गेला. पुढे इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यावर इंदौर ला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आले. होळकरांचे प्रधानमंत्री तात्या जोग ह्यांनी राजवाडा पुन्हा बांधून काढला, ते बांधकाम सन १८१८ ते १८३३ इतके चालले. राजवाड्यात दगडी आणि लाकडी अश्या दोन्ही प्रकारची बांधकामे आहेत. सन १८३४ ला राजवाड्याला लागलेल्या आगीमुळे एक मजला जळून गेला. पुढे सन १९८४ साली शीखांविरुद्ध दंगलीत हा राजवाडा सामाजाकंटकांकडून पुन्हा जाळला गेला. असे अनेक घाव अंगावर घेत उभा असलेला हा वाडा


विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मोगल, मराठा, राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेले पाहायला मिळते. ७ माजली उंच वाड्याचे खालचे तीन माजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले लाकडाच्या बांधकामाचे आहेत. जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी ग्यालेरी अप्रतिम दिसते. भक्कम मराठा शैलीच्या दरवाजातून आत गेलं की मधला चौक लागतो आणि समोर एक मजली दगडी बांधकाम आहे तिथे खाली श्री गजाननाचे मंदिर आणि वरती दरबार हॉल आहे. 



डावीकडील इमारतीत पहिल्या मजल्यावर होळकरांच्या काळातील वास्तू, शस्त्र , गालिचे, भांडी तसेच काही ऐतिहासिक कागद पात्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यशवंत होळकरांच्या काळात त्यांचे पेशव्यांशी सुद्धा विसंतुष्ट वाढले होते. पुढे नाना साहेब पेशव्यांना इंग्रजांशी बंड केल्या कारणाने पकडण्यासाठी होळकरांकडून एक लाख रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले होते तो १८५८ सालचा दस्तावेज ही ह्या प्रदर्शनात मांडला आहे. तसेच होळकर वंशाचा इतिहास आणि राजवाड्याची ऐतिहासिक माहिती सुद्धा लोकांसाठी उपलब्ध आहे. राजवाड्यासमोर एक लहानसा पण सुंदर बगीचा असून तिथे अहिल्यादेवी होळकरांचा सुंदर पुतळा आहे. 


हा राजवाडा २५० वर्ष्याच्या इंदौर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे. आणि नक्की बघावा असा आहे. राजवाड्याच्या प्रवेशासाठी रु १० आणि कॅमेरा साठी रु. २५ अशी फी आकारली जाते.


राजवाडा आवर्जून बघावा असाच आहे रात्री विद्युत रोषणाई केलेला राजवाडा तर फारच खुलून दिसतो. इंदौर रेल्वे स्टेशन राजवाडा जवळ आहे, अगदी चालत गेलात तर अधी कृष्णापुरा छत्री बघून थोडी विश्रांती घेऊन राजवाड्यावर येऊ शकतात. राजवाड्या बाहेर गर्दीचे मार्केट आहे. खाण्यापिण्याच्या गाड्याही ह्या परिसरात भरपूर आहे. 

इंदौर राजवाड्याचे ठिकाण गुगल नकाश्यात दाखवले आहे .





Tuesday, November 24, 2015

अडालज की वाव - Adalaj Stepwell





अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या 

अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता. 
  
अडालज बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या प्रसादासारखी नटलेली आहे. 



ह्या अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात झाली. 


राणा वीर सिंगशी झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि राणा वीर सिंग ना युद्धात वीरगती प्राप्त झाली. राणा जी च्या पत्नी राणी रूपबा ह्या अत्यंत रूपवान होत्या आणि ती बातमी सुलतानाला समजल्यावर हा सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करू लागला. अर्थात ती मागणी ही धमकीपेक्षा कमी नक्कीच नसणार. राणी ने अट घातली की तिच्या पती ने हाती घेतलेली अडालज विहीर जर सुलाताने पूर्ण केली तर ती लग्नाला संमती देईल आणि मग काय, हे अडलेलं काम अत्यंत वेगाने सुरु झालं. विहीर पूर्ण झाल्यावर राणी ने जातीने विहिरीची पाहणी केली, संत सज्जनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करू देऊन ते पाणी पवित्र केलं आणि मग ह्यात विहिरीत उडी मारून जीव दिला. एक पतिव्रता स्त्री मरणापूर्वी गावकऱ्यांसाठी अमूल्य उपहार देऊन गेली आणि आपल्यासारख्यांना अभिमान देऊन गेली. राणीच्या आत्मदानाचा ह्या विहिरीशी संबध आहे. एका वीर राजपूत राणीच्या बलिदानाची साक्ष देत ही विहीर आज 500 वर्ष उभी आहे. 


विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे. 



विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात



विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.


ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे. 

गुगल नकाश्यावर अडालज ते अहमदाबाद पर्यंतचा मार्ग दाखवला आहे 








Saturday, November 21, 2015

तांबेकर वाडा - Tambekar Wada


तांबेकर वाड्याबद्दल ऐकून होतो त्यातील प्रसिद्ध भित्ती चित्र बघायची इच्छा ही होतीच आणि म्हणूनच ह्या चौफेर भटकंती च्या ट्रीपमध्ये तांबेकर वाडा आठवणीने प्रोग्राममध्ये ठेवला. गुजराथ टुरिझम च्या साईटवर जरी ह्या वाड्याची नोंद असली तरी तिथे गर्दी नसते हे समजलं होतं पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा फक्त आमचाच ग्रुप तिथे होता. तांबेकर वाड्याचा रस्ता दाखवणारा कुठलाही बोर्ड वगैरे नाही तेव्हा विचारात विचारात जावं लागतं आणि कमाल म्हणजे त्या भागात देखील खुपश्या लोकांना वाड्याच्या नक्की जागे बद्दल माहिती नाही. म्हणूनच महितीच्या शेवटी गुगल नकाश्यात तांबेकर वाडा दाखवला आहे. गुगल नकाश्यावर सुद्धा अजून हा वाडा मार्क नाही, ती पण रिक्वेस्ट गुगल मेकरवर टाकली आहे. इथल्या रस्त्याचे नाव मात्र तांबेकर रोड असं आहे.







बाहेरून दर्शनी भाग जरी उत्तम आणि ठीकठाक दिसत असला तरी वाड्याच मागचा भाग ढासळला आहे. नशिबाने पुढचा भाग हा आता अर्केलोजीकॅल विभागाकडे आहे आणि तेथील भित्ती चित्रासाठी प्रसिद्ध माजले व्यवस्थित ठेवलेले आहेत.  सयाजी राजांकडे दिवाण म्हणून महत्वाच्या हुद्द्यावर असलेले भाऊ तांबेकर (विठ्ठल खंडेराव तांबेकर ) ह्याच्या रहिवासाचे हे ठिकाण. G +३  असलेली ही हवेली बाहेरून अगदीच साधारण वाटत असली तरी आतून रंगांची उधळण करत समोर येते.  हवेलीच्या डावीकडून वरती जाण्यासाठी जिना आहे आणि तिथेच पुरातत्व विभागाने हवेलीची माहिती लावली आहे. त्यानुसार १८४९ ते १८५४ ह्या सहा वर्षात भाऊ तांबेकरांचे हे निवासस्थान होते. वर जाणारे जिने खूपच चढे आहेत आणि गुढगा दुखीवाल्यांची परीक्षा पाहणारे आहेत पण एकदा का तुम्ही पहिल्या मजल्यावर पोचलात की  सर्व काही रंगांमध्ये विसरून जाल हे निश्चित. पहिल्या मजल्यावर दर्शनी हॉल  नजरेचं पारण  फेडतो. 





अर्थात पुरातत्व विभागाने ताब्यात घेण्यापूर्वी दुर्लक्षित राहिलेला हा वाडा असल्याने चित्रांना थोडी फार क्षति पोचलेली आहे पण जे शिल्लक आहे ते हि आपल्या कल्पने पलीकडले आहे. ह्या हॉल मध्ये विविध देवी देवता तसेच अनेक ऐतिहासिक प्रसंग चित्रित केलेले आहेत आणि विशेष म्हणजे फक्त भिंती नाही तर दरवाजे खिडक्या ही चित्रांनी सजवलेल्या आहेत. संपूर्ण लाकडी खांब आणि विटांचे बांधकाम केलेला हा वाडा तुम्हाला अचंबित करून सोडतो . हॉल ला लागून डावीकडे अनेक दरवाजे आहेत जे तुम्हाला ग्यालरीत आणि वरच्या मजल्यावर नेतात तर हॉल  च्या समोर सुंदर लाकडी जाळी  आहे. ह्या जाळीवर देखील रंगांची उधळण आहेच 


इतके फोटो आणि रंगसंगती टाकता येतील की  विचारू नका. इथे रामायण महाभारतातले अनेक प्रसंग चित्रले आहेत तर मराठा इंग्रज युध्दाचे प्रसंग हि हॉल मध्ये दिसतात. तर काही चित्र जी युरोपीअन शैलीतली आहेत.
दुसऱ्या मजल्यावर ही  परत एकदा चढ्या जिन्याशी झटापट करून पोचावे लागते. इथे ही  दोन खोल्या आहेत आणि  बाहेरची मोठी खोली मध्ये भित्ती चित्र नाही. पण लागून असलेल्या दुसऱ्या खोलीत परत अप्रतिम चित्र आहेत. हे जर वेगळ वाटलं  म्हणून अजून चौकशी केली तर मिळालेली माहिती धक्कादायक होती 

पूर्वी इथे शाळा भरायची आणि मग मुलं चित्रांशी खेळायची म्हणून भिंती स्वच्छ पांढऱ्या रंगाने रंगवून टाकल्या. ते ऐकून एकदम खिन्न झाल्यासारखं वाटल. अप्रतिम भित्ती चित्र नष्ट झाली आणि त्यावर चढला पंधरा शुभ्र रंग जो आता पिवळा पडला आहे. माहिती तिथे समजलेली आहे पण भिंती नीट  पहिल्या तर आजही मागचे रंग नजरेला जाणवतात. आतली खोली मात्र अप्रतिम आहे . विविध धर्माच्या लोकांचे पेहराव. काही युरोपीअन चित्र देव देवता. श्री कृष्णाची रासलीला, त्याचे बालपण तसेच मराठी स्त्री वगैरे चित्रले आहे. 

इथे वापरलेले रंग हे सोन्याच्या किमतीचे आहेत अस समजल आणि दारावर नक्षीकामासाठी हस्तिदंताचा उपयोग केला आहे. ही  हवेली प्रचंड पैसे खर्चून नटवलेली आहेच पण येथली चित्रकला केवळ अनमोल आहे. हवेली अत्यंत साफ आणि नीट नेटकी ठेवणारे कर्मचारी वर्ग तुम्हाला मदत हि करतात. एकंदरीत हा अमुल्य ठेवा तुम्ही नक्की जाऊन बघावा असाच आहे 


येथे साधारण ३०० भित्ती चित्र उरली आहेत.  आणि उरलेली हवेली कोसळण्याच्या स्थितीत आहे. ह्या रस्त्यावर बरीच मराठी नावं  असलेले वाडे आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातून आलेले लोक त्याकाळी एकत्रित इथे राहत असावे. हा वाद सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उघडा असतो. पण वाड्यात लाईट नाहीत, तेव्हा संध्याकाळी उशिरा जाऊ नका. ह्या हवेलीला प्रवेश फी सुद्धा नाही आहे 





आणि एक नम्र विनंती आहेत.  हा अमुल्य ठेवा आपणच जपायचा आहे. तिथे लाईट नाहीत कारण भित्ती चित्रांना क्षती  पोचू नये म्हणून  तेव्हा तुम्ही फोटो काढाल तर कृपया फ़्लाश वापरू नका. भले फोटोला लाईट कमी का पडे ना 

तांबेकर वाडा  गुगल नकाश्यावर दाखवला आहे 






































Wednesday, October 7, 2015

कास पठार - kaas plateau - UNESCO Site




कास पठार म्हणजे निसर्ग मित्रांचे नंदनवन, ऑगस्ट , सप्टेंबर महिन्यात फुलणारे फुलांचे गालिचे, विविध रंगाची, आकाराची फुलं म्हणजे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांचा जणू कुंभमेळा. नजरेचं पारण फिटणे ह्या म्हणीचा आशय  खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचा असेल तर कास पठारावर ह्या काळात एकदा नक्की जावे.

सोनकी - Graham's groundsel
कास पठार हे UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचे दोन प्रकार आहेत १) सांस्कृतिक वारसा स्थळे २) नैसर्गिक वारसा स्थळे. साल २०१२ ला भारताच्या पश्चिम घाटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला त्यात ३९ जागांचे संवर्धन गरजेचे ठरले त्यातली एक महत्वपूर्ण जागा आहे “कास पठार”. ह्या पठारावर ८५० प्रकारची विविध फुले फुलतात. International Union for Conservation of Nature and Natural Resources ( IUCN ) हि संस्था जगातील विविध पशु तसेच वनस्पती ह्यांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करून ज्या प्रजातींचा ऱ्हास होतो आहे त्याची एक रेड लिस्ट प्रकाशित करते, त्या प्रजातींचे संवर्धन अत्यंत गरजेचे असते अश्या ह्या रेड लिस्ट मधील साधारण ३९ फुले हि कास पठारावर अस्तित्त्वात आहेत. ही माहिती देण्याचे कारण की कास पठार बघतांना आपल्याला किती जबाबदारीने ह्या फुलांचं आनंद घ्यायचा आहे हे समजू शकेल. ह्या वेगाने ऱ्हास होणाऱ्या प्रजातींना आपल्याकडून नुकसान होणार नाही ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून कास पठार फिरायला हवे. Aponogeton satarensis (वायातुरा) नावाची अति दुर्मिळ वनस्पती कासला आढळते ती बघायला मिळाण नशिबाचा भाग आहे. आमचं नशीब इतकं ही जोरावर नव्हतं पण ही वनस्पती केवळ साताऱ्यात आढळते म्हणूनच तिच्या नावात हि satarensis असा उल्लेख दिसतो 

साताऱ्या पासून साधारण २५ कि मी वर महाराष्ट्राचे valley of flowers, कास पठार आहे. कासला जाणारा रस्ता, घाटात उतरलेले ढग, हिरवागार शालू नेसून आपल्या स्वागताला जणू तयार निसर्ग आणि फुलांच्या रंगांची उधळण हे बघत आम्ही सकाळी ८:०० पर्यंत कास ला पोचलो. गर्दी टाळायची असेल आणि सुट्टी हातात असेल तर आठवड्याच्या मधल्या दिवसात कासला जावे कारण शनिवार रविवार तिथे जणू जत्रा भरते. कार पार्किंग इतक्या दूर करावी लागेल की फुलांपर्यंत पोचताच दामायला होईल. पण कास खरोखर बघायचं असेल तर भरपूर भटकायची तयारी करून जाणं गरजेच आहे. 




कास तलाव - Kas Pond
कास ला किती वेळ लागेल हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण फुलांबरोबरच विविध फुलपाखरं, पक्षी सुद्धा बघायला मिळतात. कास ला जायला काही बसेस पण आहेत साताऱ्याहून पण स्वत:चे वहान हा खरच जास्त सोयीस्कर पर्याय आहे जेणे करून तुम्ही कास पठारावर जास्त वेळ देऊ शकता. रात्री उशिरा साताऱ्यात धडकून आणि मुक्काम करून सकाळी कास पठार असा कार्यक्रम आम्ही आखला होता. आणि साताऱ्यात पोचलो तो जो मुसळधार पाऊस सुरु झाला कि उद्याची फुलांच्या दुनियेत जायची स्वप्न हा पाऊस वाहून नेतो की काय अशी काळजी वाटायला लागली पण पहाटे उठलो ते स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र निळे आकाश बघत

Panoramic view from kaas Plateau

साताऱ्यात राहण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, तसेच MTDC मान्यताप्राप्त राहण्याच्या व्यवस्था कास पठारा पासून जवळ उपलब्ध आहेत. “कास पुष्प यात्री निवास” त्यासाठी संपर्क : श्री विठठल किरदात , भ्रमणध्वनी - 8291008666, 9594934666, 8080077606, 9420488392  
 
Malabar Lark - मलबारी चंडोल

कास पठार कातळ खडकाचे असून, माती व अन्न द्रव फार कमी प्रमाणात आहे. हे पठार अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. पण त्याच बरोबर येथील वातावरण शेकडो रानफुलांना पोषक असं आहे आणि ह्या अग्निजन्य खडकावरही जणू स्वर्ग अवतरतो.









पूर्वी कास पठारावर मुक्त भटकंती शक्य होती पण पर्यटकांनी भरभरून नुकसान करायला सुरुवात केली. प्लास्टिक पिशव्या, कचरा वाढू लागला. प्रेयसी चे फोटो फुलात बसून काढणाऱ्या प्रेमवीरांना आपल्या प्रेयसी / बायको पेक्षा ही रानफुलं नाजूक आहेत हे कदाचित समजलं नाही. मुलांना बगीचात खेळायला आणल्यासारखे फुलात बागडायला सोडणारे  पालक ही दिसू लागले. फोटोग्राफी करण्याच्या नादात फुलांच्या बहरात कॅमेरा घुसावणारे फोटोग्राफर दिसू लागले. आणि मग नाईलाजाने सरकारला कास पठारला कंपाउंड घालावं लागलं आता निर्धारित रस्त्यावरून चालत पठार बघावं लागतं तरी हि ह्या कंपाउंड मधूनही फुलात शिरणारे वीर ह्या देशात दिसतात. आपण जेव्हा कास ला भेट द्याल तेव्हा ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्याल ह्याची खात्री आहे


सध्या कास ला पार्किंग शुल्क आणि प्रवेश शुल्क आकारले जाते. कधी कधी कॅमेरासाठी सुद्धा शुल्क आकारतात ह्या पैश्यातून पठार संवर्धनासाठी कामे तसेच जवळच्या गावांत काही कामे केली जातात. सातारा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि तुम्ही कास च्या जोडीला जवळची अनेक पर्यटन स्थळे करू शकता. चार पूर्ण दिवस सातारा परिसराची पिकनिक ठरवू शकता

कास मध्ये मिळालेले काही फुलांचे फोटो इथे टाकतो आहे.


Lambert's Borage - हिरवी निसुर्डी

Vigna vexillata - हळुंदा, रानघेवडा
Neanotis lancifolia - तारागुच्छा














Impatiens oppositifolia  - तेरडा
Curcuma caulina - चवर


Habenaria foliosa - उग्र हबेअमरी
Water Willow - करंबल



Nimphoides Indicum- कुमुदिनी
Pogostemon deccanensis - जांभळी मंजिरी




Solanum xanthocarpum - काटे रिंगणी
Strobilanthes callosus - कारवी


Konkan Pinda - पंद, पेंद

दीपकाडी - Dipcadi montanum
Cyanotis Cristata - नभाळी
सोनकी - Graham's groundsel













































































साताऱ्याहून कास पठारावर जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे